आलापल्ली : दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आलापल्ली मधील वीर बाबुराव शेडमाके चौक येथे गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आलेले चक्का जाम आंदोलन उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी झाले.
सकाळी नऊ वाजल्यापासून विविध सामाजिक संघटना, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने परिसरात चक्का जाम आंदोलनाचा प्रभाव दिसून आला. मात्र आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले. आंदोलकांनी संविधानिक मार्गाने आपला निषेध नोंदवत केंद्र सरकारने विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.
मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावल्याने हे आंदोलन यशस्वी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.










