गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तहसीलमध्ये DBT व कृषी योजनांतर्गत सुरू असलेल्या शेततळे कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे. या प्रकरणात शासन निधीचा अपहार होत असून कास्तकारांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, कास्तकारांच्या खात्यात जमा झालेली पूर्ण मंजूर रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून काढून घेतली जात असून त्यापैकी केवळ सुमारे 60 हजार रुपये मशीन धारकाला देण्यात येत आहेत. उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवून कास्तकारांना “पूर्ण पैसे दिले” अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कमी खोदकाम करून चारही बाजूंनी माती टाकून अधिक काम झाल्याचे दाखवले जात असल्याचीही शंका व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रत्येक खात्यात जमा झालेली रक्कम, पैसे काढण्याची प्रक्रिया, मशीन धारकाला दिलेली रक्कम तसेच प्रत्यक्ष खोदकाम व मोजमाप पुस्तिकेची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करून शासन निधीचा अपहार थांबवावा, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.










